
केज । प्रतिनिधी
महावितरणमध्ये कार्यरत कंत्राटी कामगार हे वीज वितरण व्यवस्थेचा कणा मानले जातात. हे कामगार कमी वेतनावर, अनिश्चित कालावधीत आणि अत्यंत कठीण परिस्थितीत सेवा पुरवत असतात. मात्र वेळेवर टेंडरचे नुतनीकरण न होणे, नवीन एजन्सीची नेमणूक न होणे आणि यामुळे निर्माण होणारी असुरक्षितता यामुळे अशा कामगारांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागतो.
दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी महावितरणच्या केज उपविभागातील आउटसोर्स ऑपरेटर व टेक्निशियन यांचे टेंडर संपले. त्यानंतर ३ जून २०२५ पर्यंत कोणत्याही नवीन एजन्सीची नेमणूक झाली नाही. यामुळे या कामगारांचे भवितव्य अंधारात गेले असून, त्यांच्या रोजच्या रोजगारावर टांगती तलवार आहे. सोनू सर्विस व डी. एम. दहिफळे या पूर्वीच्या एजन्सींनी कामगारांना पत्र देऊन काम बंद करण्यास सांगितले असून, यानंतर कोणतीही अनुचित घटना घडल्यास जबाबदारी न घेण्याचे स्पष्ट केले आहे. ही भूमिका अत्यंत असंवेदनशील आणि कामगारविरोधी असल्याचे जाणवते. केज महावितरणातील तालुक्यातील कामगारांनी एकत्र येऊन ४७ जणांच्या सह्यांसह निवेदन दिले असून, दिनांक ६ जून २०२५ पासून मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यांनी नवीन एजन्सी तातडीने नेमावी, अशी नम्र पण ठाम मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. या आंदोलनामुळे वीजपुरवठा व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होण्याचा धोका आहे. नागरिकांची गैरसोय, शेती व उद्योगधंद्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने कामगारांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे .कंत्राटी कामगार हे देखील एक महत्त्वाचा घटक असून, त्यांचाही सन्मान आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे ही सरकार व प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यांचे योग्य वेळी समाधान न झाल्यास अशा आंदोलनांची पुनरावृत्ती होऊ शकते, ज्याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसतो. त्यामुळे वेळेत टेंडर प्रक्रिया, संवाद आणि स्थायित्व ही गोष्टी प्राधान्याने हाताळणे आवश्यक आहे.
अंदोलन स्थळावरून दैनिक वादळ वार्ताच्या प्रतिनिधीनी व्यवस्थापक रोहिनी कुलकर्णी मॅडम ( मंडळ कार्यालय बीड ) यांना भ्रमरध्वनीवरून संपर्क साधला असता कॉल उचलला गेला नाही.



