केज/प्रतिनिधी
मस्साजोग येथील तरुण सरपंचाचे अपहरण करुन, त्यांना टॉर्चर करीत अमानवीय हत्या घडवून आणली आहे. त्यामुळे या घटनेतील मास्टरमाईंडचा शोध लावून सर्वांना कठोर शिक्षा व्हावी.ज्या कारणासाठी हत्या करण्यात आली, त्या खंडणी प्रकरणातील सर्वच आरोपींना १५ डिसेंबरपर्यंत अटक करण्यात यावी, अन्यथा जनतेचा आक्रोश आटोक्यात ठेवणे अशक्य होईल, असा स्पष्ट इशारा खा.बजरंग सोनवणे यांनी दिला.दरम्यान खा. बजरंग सोनवणे यांनी दिल्लीहून येताच शुक्रवार (ता.13) सकाळी पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मस्साजोग येथे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेऊन आदरांजली वाहिली.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. एक तरुण उमदा माणूस अतिशय अमानवीय पद्धतीने जिवंतपणे मारला गेला आहे. त्यामुळे केज पोलिस ठाण्यात या प्रकरणाचे तपास अधिकारी, पोलीस उपअधीक्षक कमलेश मीना यांची भेट घेऊन, पोलिसांच्या हलगर्जीपणाचा जाब विचारत सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली.
बीड जिल्ह्यात या अमानुष घटनेच्या निषेधार्थ शांततापूर्ण बंद पाळण्यात आला आहे.जिल्ह्यात प्रचंड संताप व्यक्त होत असून, पोलिस प्रशासनाने त्वरित पावले उचलून दोषींवर कारवाई केली नाही, तर याचा उद्रेक होईल.यासाठी प्रशासनाने तत्काळ न्याय देण्याची भूमिका घ्यावी, केज पोलिसांनी वेळीच पावले उचलली असती तर संतोष देशमुख यांचा जीव गेला नसता, त्यामुळे यानंतर तपास कसलाही हलगर्जीपणा पोलिसांनी करता कामा नये. असे खडेबोल खा.बजरंग सोनवणे यांनी सुनावले.जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही.अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्टपणे बोलून दाखवली.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!