केज।प्रतिनिधी
केज ते कळंब रोड हा मुख्य मार्ग असूनदेखील रस्त्याच्या डाव्या बाजूस आजपर्यंत नाल्याचे बांधकाम न केल्यामुळे दलित वस्तीतील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात नाल्याचे पाणी घरात शिरण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या अन्यायाविरोधात दलित समाजातील नागरिकांनी अखेर केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.ग्रामपंचायत व आता नगरपंचायत अस्तित्वात असताना, आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कळंब रोडच्या डाव्या बाजूला एकही नाली बांधण्यात आलेली नाही. परिणामी, पावसाचे सांडपाणी थेट घराघरांत घुसते. या भागात वारंवार रोगराईचे प्रमाण वाढले असून नागरिक आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड देत आहेत. याउलट, रस्त्याच्या उजव्या बाजूस व गल्लीगल्ली नाल्या बांधण्यात आलेल्या दिसतात.
तक्रारींची दखल नाही : नागरिकांनी नगरपंचायतीकडे वेळोवेळी निवेदने दिली, तोंडी तक्रारी केल्या, तरीही प्रशासनाने दुर्लक्षच केले. या भागात दलित समाजाची वस्ती असल्यामुळे जाणूनबुजून विकासकामे टाळली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
उपोषणाला प्रारंभ :या अन्यायाविरोधात सतीश बनसोडे, राजाभाऊ बचुटे, सिताराम कसबे, आल्काताई सरवदे, सिद्धार्थ हजारे, राज वैरागे यांच्यासह अनेकांनी केज तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले असून, शासनाने लक्ष दिले नाही तर उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
स्थानिक नगरसेवक अकर्तव्यदक्ष? :वार्ड क्र. १७ चे नगरसेवक राजू इनामदार यांच्यावर नागरिकांनी अकर्तव्यदक्षतेचा ठपका ठेवला असून, त्यांनी निवडून आल्यापासून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!