रात्रीच्या अंधारात दुकान उघडून माल काळ्या बाजारात घेऊन जाणे महागात पडले
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
स्वस्त धान्य दुकानातील जिवनावश्यक धान्य काळ्या बाजारात घेऊन जाणारी गाडी मध्यरात्री नागरिकांनी पकडून पोलिस आणि पुरवठा विभागाला माहिती दिलेल्या स्वतधान्य दुकानावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या तोंडातला घास पळविणाऱ्या बदमाशात खळबळ माजली आहे.
या बाबतची माहिती अशी की, शनिवार दि. २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २:०० वा. च्या सुमारास नांदुरघाट येथील सेवा सहकारी सोसायतीच्या स्वस्त धान्य दुकानातील धान्य हे सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी जाधव व त्यांच्या सोबचे अन्य तीन ते चार अनोळखी इसम हे सदतील माल हा पशु खाद्याच्या रिकाम्या पोत्यात भरून काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी एका पिकअप क्र. (एम एच-२३/ए यु- ३१९८) मध्ये भरून घेऊन जात होते. दरम्यान रात्री रजनीकांत खाडे हे शेतात जात असताना त्यांना तेथील सर्व हालचाली या संशयास्पद वाटल्या म्हणून त्यांनी तात्काळ ही माहिती नामदेव खाडे यांना मोबाईल वरून देऊन त्यांना बोलावून घेतले. त्या दोघांनी मोबाईल मध्ये त्याचे व्हीडिओ चित्रण केले. त्या नंतर त्यांनी ही माहिती नांदूरघाट दूरस्थ पोलीस चौकीचे पोलिस नाईक अशोक मेसे यांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात सदर वाहन ताब्यात घेतले आणि ही माहिती पुरवठा विभागाला दिली.
त्या नंतर केज तहसीलच्या पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सुहास हजारे, मंडळ अधिकारी पठाण आणि तलाठी शिंदे यांनी नांदूरघाट येथे जाऊन पंचनामा केला आहे.
सदर प्रकरणी तहसीलदारांच्या अहवाला नुसार यांनी सादर केलेला खुलासा तसेच घडलेल्या प्रकाराबाबत तक्रारदार व रास्त भाव दुकानदार तहसिलदार केज यांनी सादर केलेल्या अहवालावरुन प्रस्तुत प्राधिकारपत्रधारक चेअरमन शिवाजी जाधव सेवा सहकारी सोसायटी नांदुरघाट यांची कृती शासन निर्णय १२ नोव्हेंबर १९९१ नुसार गंभीर स्वरूपाच्या दोषारोपा मध्ये समाविष्ट होणारी आहे. त्या बाबत शासन निर्णय क्र. साविव्य१०९१/२४२४/प्र ६१७८/नापु २८ दिनांक १२ नोव्हेंबर १९९१ व तद्नंतर प्राप्त झालेल्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार आढळुन आलेल्या रास्त भाव धान्य दुकानावर करावयाची कार्यवाही बाबत निर्देशा नुसार तहसिलदार यांचे अहवाला वरुन, प्रकरणी संबंधीत रास्त भाव धान्य दुकानचे परवाना धारक यांनी शासन निर्णयातील तरतुदीचा भंग केल्याचे निष्पन्न होत असल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड यांना प्राप्त अधिकाराचा वापर करुन चेअरमन सेवा सहकारी सोसायटी, नांदुरघाट यांचे नावे असलेल्या रास्त भाव धान्य दुकानचे विरुध्द कार्यवाही करून शिवाजी जाधव, चेअरमन सेवासहकारी सोसायटी, नांदुरघाट यांचे नावे असलेल्या रास्त भाव धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख यांनी काढला आहे.
यामुळे रेशनचा गोरख धंदा करणाऱ्यात खळबळ माजली आहे.